Wednesday, September 25, 2013

कॉकटेल


व. पु. काळेंच 'महोत्सव' वाचत पडले होते. व. पु. म्हणजे एक समीकरण आहे, जे सोडवत असताना कळत जात कि मूळ  प्रश्नातच उत्तर दडलेलं आहे. नात्यांचे रंग अगदी सुंदर पद्धतीने रंगवणारे म्हणजे व.पु हि व्याख्या माझ्यासाठी. तेवढ्यात बऱ्याच दिवसांनी एका मैत्रिणीचा -अंजलीचा फोन आला. इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या नंतर तिने सांगितले कि आजच ती समृद्धीला भेटली होति. साहजिकच मी विचारले समृद्धी बद्दल कि काय करते, कशी आहे ती. फार दिवसात काय पण वर्षात समृद्धी चे आणि माझे बोलणे नव्हते, अर्थात ती माझी तेवढी जवळची नव्हतीही कि मी मुद्दामून कधी तिला बोलायला गेले नाही .
अंजू सांगू लागली कि अग समृद्धी तर खूप मजेत आहे. नुकताच लग्न ठरलं आहे तीच आणि आता साखरपुडा होणारे. त्याची खरेदीच करायला आली होती ज्वेलर्स च्या दुकानात. मी गणपतीसाठी चांदीचा पूजा सेट घेण्यासाठी गेले होते, आणि तिथे समु दिसली. हिऱ्याचे दागिने घेत होती ती साखरपुड्यासाठी आणि तेसुद्धा स्वताच्या कमाई ने . एका मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या हुद्द्यावर काम करते आहे ति. पुढच्या महिन्यात कंपनी तर्फे जर्मनी ला जात आहे .

अजून चार दोन गोष्टी बोलून अंजू ने फोन ठेवला. मी परत व.पु मध्ये गुंतले. पण काहीतरी गडबड झाली होति. व.पुंच्याच भाषेत सांगायचं तर मी कथा वाचत होते, शब्द डोळ्यासमोर होते पण रजिस्टर होत नव्हते. एकदम अस्वस्थता आली होती मनामध्ये . आणि असे का हे कळत नव्हते. मग थोडा विचार केल्यावर मनाची उजळणी केल्यावर लक्षात आले कि माझ्या मनाची हि स्थिती अंजूचा फोन ठेवल्यापासून झाली आहे . आणि मनाला मान्य होत नव्हते पण या अस्वस्थतेचे कारण समृद्धी होती . आता या सर्वात समृद्धी चा काय संबंध आहे . तिची आणि माझी तेवढी मैत्री पण नव्हती . मग ?
त्यासाठी आपल्याला थोडस मागे जाव लागेल . मागे म्हणजे माझ्या कॉलेज च्या दिवसात.

कॉलेज  मध्ये असताना समृद्धी, अंजू, मी , पूर्वा, कादंबरी असा सर्व जणींचा ग्रुप होता . आमच्या मध्ये मी सर्वात जास्त अभ्यास, करिअर यांना महत्व देणारी होते . म्हणजे बाकीच्या नव्हत्या असे नाही . पण माझी इच्छा थोडी जास्तच होती आणि प्रबळ ही.  मी घरातील लग्न किंवा इतर समारंभा मध्ये कमी आणि कॉलेज च्या activities मध्ये जास्त असायचे . पण माझे आई वडील त्या वेळी जुन्या विचारांचे होते. मला इंजिनिअर ची डिग्री मिळाली कि लगेच २ महिन्यात लग्न उरकायच असाच त्यांचा बेत होता . पण मी माझ्या निर्णयावर ठाम होते. एकतर एकुलती एक असल्याने मला असा वाटायचं कि मीच आई वडिलांचा मुलगा बनून मुलगा जी सुख देतो आई वडिलांना ती द्यायची. आणि ते सुख त्यांना देण्यात मला अपार सुख मिळणार होते. समृद्धी च्या घरी वातावरण आधीपासून च खूप आधुनिक होते. पण तिची अभ्यासात तेवढी प्रगती आणि इच्छा  अशी काही नव्हती . खरतर इंजिनिअर ला एडमिशन मिळाले म्हणून ती ते शिकत होती. मला स्वावलंबी बनून माझ्या स्वताच्या बळावर आयुष्यामध्ये सर्व काही मिळवायचं होत . आणि माझ्या उलट समृद्धी. ती तर विचार करायची कि  श्रीमत घरी लग्न करून आयुष्य एकदम आरामात घालवायच. झालाच तर पुढे एम. बी . ए . शिकायचं . अशा आम्ही दोन टोकांच्या होतो . पण आज समृद्धी माझ्या भूमिकेत आणि मला तिच्या भूमिकेत स्वताला पाहताना तिचा हेवा वाटला.

आणि म्हणून मी खूप अस्वस्थ झाले होते. माझ्या आई वडिलांनी त्यांनी ठरवल्याप्रमाणे माझ लग्न लवकर उरकून टाकल. लग्न झाल आणि माझ करिअर, करिअर करण्याची जिद्द सर्व काही वसंतातल्या पानगळी प्रमाणे गळून पडल . सासरी सर्व सुख असूनही मी मात्र सर्वापासून वंचितच राहिले. कारण माझ अस अस्तित्व नव्हतच तिथे. ती निर्माण करायची जिद्द सुद्धा अंगात नव्हती याबद्दल अजून जास्त वाईट वाटायचं. एकटी असले कि असे विचार नेहमीच मनात रुंजी घालत. आणि आज मी जी काही जीवापाड स्वप्न पहिली होती ती समृद्धी ला जगताना पाहून मला हेवाच वाटला तिचा. एक अर्थाने कुठे तरी मनात समाधान हि होत कि  मी नाही करू शकले तरी ती तरी करू शकली ना. दुसऱ्या क्षणी स्वताची चीड येत होती हे सर्व मी का करू शकले नाही. त्याच्या पुढच्या क्षणाला वाटल कि आपल नशिबच अस आहे त्याला काय करणार. पण मग वाटल कि आपण तर नशीब घडवण्यावर जास्ती विश्वास ठेवायचो मग आता का दुर्बल विचार मनामध्ये. मग वाटल कि आपल्या असहायतेला आपण नशीब म्हणत आहोत. मग वाटल कि छानच झालाय आयुष्य आत्ताही . माझा नवरा, सासरची मंडळी सर्व इतकी चांगली भेटली हे चांगलच झाल ना आयुष्यामध्ये. पण जी स्वप्न जीवापाड जपली ती प्रत्यक्षात न येत स्वप्नातच राहिली . त्यातला एखाद तरी स्वप्न खर ठराव, माझ आयुष्य सार्थकी लागल्यासारख वाटेल. शेवटी वाटल कि या प्रसंगाने माझ्या मनात कॉकटेल निर्माण केलंय . राग , प्रेम , आनंद , दुख, सुख , समाधान, असूया, हेवा , मोह , तिरस्कार, असहायता सर्वच हवन एकदमच गोंधळ घालत आहेत मनात.

शेवटी आयुष्यात काय केलय यापेक्षा कोणत्या भावनेने केल आहे तेच जास्ती महत्वाचे, सर्वाना आनंदाने दिलेल्या गोष्टी सरतेशेवटी आपल्याला आनंदच देवून जातात. हाती आहे ते सोडून पळत्यामागे धावले कि तेल सांडून जाते आणि तूपही लवंडून जाते.  

       

Saturday, December 15, 2012

दारू देसी - २


ती आणि तिचे कुटुंब फिरायला गेले होते. तिचे अहो आणि तिची मुले आनंदात खेळत होती. 

मुल आता मोठी झाली होती. एकीच लग्न झाल होत आणि मुलगा नोकरी करत होता. 

मुलगा आणि वडील याचं बोलन सुरु होत. 
त्यांच्या भागामध्ये एक दारूचे दुकान उघडले होते त्यावरून. 
ती दुपारची विश्रांती घेत होती. वर्तमान पत्र वाचत होती. तिने डोळे झाकले, आणि पुनः तिचा स्वप्नातला प्रवास सुरु झाला.

तीच आयुष्य ती अशीच तर स्वप्नामध्ये जगात आलीये. प्रत्तेक वेळी आपल्या मनासारख घडत असेल स्वप्नामध्ये तर का नको न असा जगायला. आणि तीच मनही हलक होवून जाई . आणि मग तिला Theory of Quantum  आठवू लागली. जशा पदार्थाच्या निरनिराळ्या अवस्था असतात, जसे कि पाणी हे स्थायू, द्रव आणि वायू अशा तीन अवस्थामध्ये असते. जशी Transition Phase  असते तशीच आयुष्याच्या पण अवस्था असतात. एका अवस्थेमध्ये जर ती housewife  असेल तर दुसऱ्या कोणत्यातरी अवस्थेमध्ये कदाचित ती तिच्या मनाजोगी एखादी Corporate Woman असू शकेल. म्हणूनच तिला या स्वप्नाच्या जगामध्ये जायला खूपच आवडे.

मुलगा येवून तिला उठवू लागला पण तिची तंद्री लागली होती स्वप्नाच्या जगात. 
मुलगा जावून वडिलांना म्हणाला - "बाकी काही असो पप्पा. आपली आई मात्र खूपच लवकर नशेमध्ये जाते आणि दुसर्या दुनियेमध्ये रमते." 
वडील "अरे पण तिला दारूची गरज नाहीये. ती अशीच स्वताच्या इच्छा शक्तीवर नशेत जाते. तिची दारू एकदम देसी आहे. दारू देसी."

* * *           

                                

Saturday, September 29, 2012

विसर्जन - २


नारू एकदम दचकलाच. हडबडून तो उठून उभाच राहिला, त्याचा त्याच्या डोळ्यांवर क्षणभर विश्वासच बसेना. ती कसली तरी अवाढव्य व्यक्ती कि प्राणी कि अजून काही, जसं जमिनीवरून चालावं तसच अगदी उंच उंच ढांगा टाकत येत होत. हवेचा जोर वाढल्यामुळे ती अजब वस्तू नीटशी दिसतही नव्हती. नारू मात्र डोळे फाडून फाडून बघत होता. त्याचा डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. त्याने स्वताच्या तोंडाचा वासही घेवून पहिला, कि आपल्याला चढली तर नाही ना, पण त्याने तर आज दारूचा एक घोटही घेतला नव्हता. त्याने वळून बाकीच्या मंडळीकडे एक कटाक्ष टाकला, ते पिऊन तर्रर झालेले आपल्याच गोंधळामध्ये मश्गुल होते. नारुला आता दरदरून घाम फुटला होता, त्याची हिम्मतच होत नव्हती परत समुद्राकडे पहायची, ती अगडबंब आकृती अजूनही तशीच ढंग टाकत पुढे पुढे येत होती. दीड माणूसभर उंचीची ती आकृती हेलकावत किनाऱ्याच्या दिशेने सरकत होती. 
बगल्या, शोमन आणि जीरम्या सर्व जन त्या आकृतीकडे बघून मोठे मोठे आवाज काढून नाचत होती. वाऱ्याचा वेग अजून वाढला, किनाऱ्यावरच्या लाईट अचानक चालू बंद होवून झपाककन बंद झाल्या. किनाऱ्यावर फक्त अंधार अंधार पसरला. नाही म्हणता, रोडवरच्या गाड्यांच्या लाईटचा प्रकाश पडत होता. पौर्णिमेच्या आधीचे दोन दिवस, चंद्र बराच मोठा होता आणि त्याचा प्रकाश पण लक्ख पडला होता. पण अचानक कुठूनसे ढग आले अन चंद्रालाही झाकोळून टाकल.
नारूची बोबडीच वळली होती. त्याने डोळे गच्च मिटून घेतले आणि बगल्या, जीराम्या, शोमनच्या दिशेने अंदाजेच पाऊल टाकू लागला. तेवढयात ढगांचा कडकडाट झाला, जोरदार पाऊस सुरु झाला. इतक्या दिवसांचा जमिनीचा ताप शमवण्यासाठी हा पाऊस होता. मुंबई पावसामध्ये न्हावून निघत होती. नारुने डोळे उघडले, जोरदार पावसामध्ये आता हातभर अंतरावरच पण दिसत नव्हत. लाटा १० फुट उंचीवर उसळत होत्या. इतका वेळ पाण्यावर चालत येणारी ती आकृती आता हळू हळू स्पष्ट होऊ लागली. पण ती आता चालत नसून ती तरंगत होती. नारुला जीवात जीव आल्यासारख झाल. बगल्या आणि बाकीची मंडळी इतक्या वेळात त्या किनाऱ्यावर आडवी झाली होती. ती आकृती एक मूर्ती होती. ६-७ फुट उंचीची ती मूर्ती गणपती सारखी दिसत होती. पाण्यामध्ये असल्यामुळे थोडा रंग गेल्यासारखं झालेला. पण त्याची सोंड पूर्णपणे तुटलेली होती. खूप उशीर झाला होता, तांबड फुटायची वेळ जवळ आली होती. नारू ला थोडा वेळापूर्वी आपण काय काय विचार करून किती घाबरलो याच हसू येवू लागल. एव्हाना ती मूर्ती किनाऱ्याला लागली होती. त्या मूर्तीच्या जवळ जावून पाहू लागला. अगडबंब पोट, खुडलेले कान, तुटलेली सोंड, आणि दोन सुळे दात. नारुने हळूच त्या मुतीला स्पर्श केला आणि झर्रकन हात मागे घेतला, ती मूर्ती बर्फासारखी थंडगार होती. नारुला एकदम शीर शिरी भरून आली. 
तो रात्रीच्या त्या प्रसंगामुळे थकून गेला होता, बगल्या च्या शेजारी जावून तोसुद्धा आडवा झाला. 

दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळी सर्व मंडळी उठली आणि गप्पा करत बसली होती. नारू अजूनही झोपेतच होता. ती मूर्ती अजूनही तिथेच किनाऱ्याला पडली होती. किनारा पूर्णपणे सुकून गेला होता, रात्रीच्या पावसाचा कुठे मागमूसही नव्हता.

नारू, बगल्या, जीरम्या आणि शोमन नी मिळून ती मूर्ती जीरम्याच्या झोपडीमध्ये आणली. मूर्तीला साफ-सुफ केली. जेव्हा त्यांनी मूर्तीला पूर्ण साफ केल्यानंतर तीच निरीक्षण केल तेव्हा जीरम्याला असं वाटल कि त्या मूर्तीची सोंड तुटली नाहीये तर ती कधी बनवलीच नसावी. तसेच त्या मूर्तीचे कानही खुडल्यासारखे वाटत नसून ते मुळातच आखूड असावेत. जीरम्याच्या इतक्या वर्षांच्या नजरेत मोडक्या गणपतीच्या-देवीच्या मूर्ती बसल्यामुळे त्याला हे फरक पटकन जाणवले. पण तरीही त्याने जास्त विचार न करता त्या मूर्तीची डागडुजी सुरु केली. 

पहिल्याच दिवशी नारू ने त्या मूर्तीला तासायला सुरुवात केली. पूर्ण मूर्ती तासून त्यावरचा एक ठार उतरवला आणि मग ब्रश ने मूर्ती साफ करून घेतली. मूर्तीच्या हाताचे काम करताना नारुला खरी माणकाची अंगठी सापडली. त्याने लगेच स्वताच्या बोटात अडकवली. बागुल आणि जीरम्या शाडूच्या मातीचे वेगवेगळे नमुने तपासून त्या मूर्तीशी सुसंगत शाडू शोधण्यासाठी बाजारामध्ये गेले होते. शोमन आपल्या बापाच्या - मेहमूदच्या - दारूच्या गुत्त्यावर बसला होता. 

नारुने पूर्णपणे मूर्ती छान तासून ठेवली आणि तो त्याच्या मामाकडे जायला रवाना झाला. शेजारी त्याने निरोप ठेवले, कि तो मामाकडे जावून येतोय रात्री म्हणून.  
      

Friday, September 14, 2012

विसर्जन - १


सगळीकडे गणेश मूर्ती बनवायची तयारी सुरु झाली होती. ग्लोबल वॉर्मिंग मुळे 'ग्रीन गणेशा प्रोजेक्ट' सगळीकडे जोम धरत होते. पेपरच्या रद्दीपासून, घरातल्या अडगळीतल्या  सामानापासून गणेशा बनवायची जणू काही स्पर्धाच सुरु होती. खेतावाडीच्या गणपतीची यावर्षीपण जोरात उंचच्या उंच मूर्ती साकारत होती.
          खेतावाडी चाळ क्र. ९- नारू, बगल्या, जीरम्या आणि शोमन या चाळीतल्या पोरांची दादा मंडळी. चाळीतून त्यांची सरळ वाट चौपाटी ला जावून मिळते. रोज रात्री शोमन त्याच्या बापाला चढली कि त्याच्या दारूच्या २-३ बाटल्या पळवून आणत असे आणि मग त्यांची मैफिल त्या चौपाटीच्या उत्तरेला असलेल्या खोपच्यामध्ये रंगत असे. पैकी फक्त शोमनलाच घरदार होते, त्याच्या बापाच्या मेह्मुद्च्या दारूचा गुत्ता जोरदार गल्ला करत आणि शोमंसुद्धा रोज दुपारी गल्ल्यावर बसून आपली कमाई बाजूला ठेवत. शोमन - पांढरे शुभ्र वेगवेगळे शर्ट घालणार, खाली नेहमी निळी जीन्स. गोरापान रंग, कपाळावर सकाळ पासूनच कुंकवाचा नाम लावून फिरणार, आठवड्याला सिद्धिविनायक चे दर्शन. उंच आणि धडधाकट. त्याच्या नावाखेरीज त्याच्यात मुस्लीम जाणवण्यासारखे काहीच नव्हते. बगल्या मुळचा यु.पी.चा, सातव्या वर्षी पळून मुंबईला हिरो व्हायला आलेला. त्याचा आदर्श अमिताभ  बच्चन. पिक्चरचे सगळे डायलॉग पाठ. उंच पण हडकुळा, चेहरा तुकतुकीत. थोडा चांगला राहिला असता तर त्याला कोरस मध्ये तरी डान्स करायला घेतले असते, पण जितका शोमन नीट राहायचा तितकाच बगल्या गचाळ. अंघोळ पण चार दिवसाला करायचा. जीरम्या त्याच्या झोपडीतल्या घरात एकटाच राहायचा. आई होती, ती त्याला न कळत्या वयातच सोडून देवाघरी गेली होती. त्याच्या शेजारच्या रामाकाकुनीच त्याला लहानपणी सांभाळले होते. आता रमाकाकू पुण्याला राहायला गेल्या होत्या. कधी मधी त्यांचा फोन यायचा, बस तेवढंच.  बगल्या ची आणि जीरम्याची भेट स्टेशन ला झाली होती, तेव्हा पासून त्यांची जिगरी यारी होती. बगल्या जीरम्याला 'विरू' आणि स्वताला 'जय' म्हणायचं. दारू चढल्यावर तर बगल्याच्या डायलॉग ला उत यायचा. सर्वजणच चौथी पाचवी नंतर शाळा सोडलेले, फक्त नारू ने नववी गाठलेली. नारूला काही ठाव ठिकाणा नव्हता. भरपूर वेळा तर तो त्याच्या मामाकडे माहीम ला असायचा. गेला तरी रात्री झोपायला जायचा आणि सकाळी सकाळी शोमन सोबत चौपाटी वर लोळत पडलेला असायचा. कधी राहिला तर जीरम्याच्या झोपडीत मुक्काम असायचा. नाहीतर मग रात्र चौपाटीवर काढायचा. दुपारी शोमन सोबत गल्ल्यावर बसायचा. तो कसली कसली पुस्तक घेवून बसायचा. बाकी त्याला काशाच वेड नव्हत पण पुस्तकच भारी वेड. पुरण कथा, इतिहास, काठ-कादंबऱ्या भरपूर वाचायचा. तो काम काही करायचा नाही पण पाकीट मात्र खूप सफाई ने मारायचा. त्यातच त्याचा गुजरा होत असे. बगल्या आणि जीरम्या तर स्टेशनवर मिळेल ते काम करायचे. 
         गणपतीचे दिवस सुरु झाले कि मात्र सर्वांची चंगळ असायची. गणपतीपासून ते नवरात्री पर्यंत ए चौघे इतर बरेच धंदे करून बराच माल कमवून दिवाळी साजरी करायचे. त्यात जीरम्या गणपतीच्या मुर्त्या छान बनवायचा. त्याच्या त्या झोपडीमध्ये आदल्या वर्षीच्या विसर्जित केलेल्या मुर्त्यांचा खच पडलेला असायचा. त्यांनाच डागडुजी करून तो विकायचा. त्याला मदत नारू आणि बगल्या करायचे. गिऱ्हाईक मिळवून द्यायचं काम शोमनच असायचं. सर्व कार्टी १५-१६ वर्षे वयाच्या आसपासची होती. 

       जुलै महिना संपत आला होता तरीही पावसाचा पत्ता नव्हता. हे आता दर वर्षीच झालेलं, कधी पावूस आवाक्याच्या बाहेर जावून पडायचा तर कधी रुसून ढगांच्यावर कुठेतरी लांब लपून बसायचा. पावसाळ्याच्या सुरुवातीला थोडी जमीन ओली करून गेला पाऊस ते परत आलाच नाही. त्या दिवशी शोमन ने चार बाटल्यांची व्यवस्था केली होती. भटाच्या चंपीने त्याच्याकडे बघून smile केल होत त्याची पार्टी म्हणून. कधीतरीच असा चार बाटल्यांचा योग यायचा. नाहीतर २ किंवा ३ बस्स. नेहमीप्रमाणे नारू ने आपल्या हिस्स्याची दारू बगल्याला दिली. बगल्या आधीच खूप तर्रर होता त्यात अजून नारुने तेल ओतले. 

जीरम्या पण जोश मध्ये येवून बोलू लागला, "बागुल, ए बागुल. तू तो मेरा जिगरी यार  है  रे. ये ले मेरी बोतल भी पी ले. "
बगल्या फुल्ल मोठ्ठ्या आवाजात, "ओये, मै आज भी फेकी हुई दारू नही पिता... आय ... ले वो बोतल. और अपनी जेब मी रख, दम है तो मै खुदही निकाल लुंगा... है कोई मै का लाल..."
नारू शांतपणे तिथल्या लाईट च्या प्रकाशात कधीच कुठले तरी पुस्तक वाचण्यात मग्न झाला होता. शोमन बारीक डोळे करून समुद्राकडे पाहू लागला, "आरे दोस्त, ते काय तरंगत आहे?"
"तुला खूप चढलीये शोम्या " - बगल्या. 
"नाही, ते पांढर काहीतरी उंच पाण्या वर  तरंगत आहे. शोमन बरोबर बोलतोय." - जीरम्या.
"विरू, तुझे भी चढ गयी. कोई गल नही." - बगल्या असा बोलतो आणि समुद्राकडे तोड करून उभा राहतो. 
आणि एकदम बोलतो, "आरे हे काही तरंगत नाहीये. पाण्यावर चालत आहे कोणीतरी. हा हा हा.."
यांचा गोंधळ ऐकून नारू त्यांच्याकडे एक दृष्टीक्षेप टाकतो आणि परत पुस्तकात डोक घालतो. 
"ए नारू, तू पण बघ... अरे पण तुला कस दिसणार. असले देखावे दिसायला तुम्हाला प्यावी लागते. " - शोमन. 
"ए नारू मोशाय. जरा इधर ये नजरा तो देख." - बागुल.
त्यांच्या या परत नारू च्या जयघोशामुळे नारू नाखुशीनेच त्यांच्याकडे पुन्हा एकदा बघतो आणि बागुल ने बोट केलेल्या दिशेकडे बघतो.
एकदम दचकतोच तो.     
 

Thursday, August 23, 2012

असेच काहीबाही, मनातले गोंधळ.


डोळे भिजून गेले होते ... पाण्याने उशी सुद्धा ओली ओली झाली होती. ती उठली आणि लिहायला बसली.. तेही काही सुचेना ...
खूप काही आठवत राहिले तिला, एकदम भार्काताल्यासारखे ती आठवणींमध्ये हरवून गेली - चांगल्या वाईट सर्वच.... 

रडताना तिला संदीप आणि सलील ची कविताही आठवत होती - 'गुलाबाची फुले दोन रोज रात्री डोळ्यांवर मुसु मुसु पाणी सांग भरतील काय...'
पण मधेच विचार करे कि काय फरक पडतोय आपण रडतोय याचा.. पण परत स्वताशीच म्हणे, निदान मनाला मोकळ तरी वाटत...

अगदी लहानपणीच आठवलं तिला - 
आई फ्रोक ची चेन बिघडली याचं दोषी तिलाच ठरवत होती. आणि ती बिचारी काहीही न बोलता गुपचूप डोळ्यांमधून टिपं गाळत उभी होती. 

बाहेर खेळायला गेली आणि धडपडून आली. गुढगा फुटला होता, आधी कुठे लागल हे बघायचं सोडून शब्दांचा मार मिळाला. मलम तर ती आधीच बाहेरूनच लावून आली होती- कसल्या तरी झुडुपाच्या पाल्याचा रस.
परत खेळायला गेली आणि परत पडून आली. मग तेव्हा तर तिने सांगितलेच नाही कि परत पडले आणि लागलं म्हणून. नशीब त्याच गुढग्यावर लागल्यामुळे दुसरीकडे कुठे जखम झाली नाही कि आईला समजलेही नाही. 
शाळेमध्ये कोणीच मैत्रीण नव्हत तिला. दुसरीमध्ये असताना तिच्या वर्गातल्या दोन जुळ्या बहिणींनी तिला बेंचवर बसण्यावरून बोचकारले होते. तिला खूप वाईट वाटले होते तेव्हा. 

कधीतरी पुढे पाचवीमध्ये तिला एक मैत्रीण भेटली. तिच्याशिवाय तिचं पान हलत नसे. तिचा अभ्यास सुधारला, तिने चित्र काढायला सुरुवात केली, कविता करायला सुरुवात केली. वर्गामध्ये ती लीडरशिप करू लागली आणि याचा सर्वात जास्त आनंद तिच्या मैत्रिणीला होई. आज तिला त्या मैत्रीणीचीही खूप तीव्र आठवण होऊ लागली होती. पण ती आता तिच्याशी बोलूही शकत नव्हती. कारण ती इतकी मऊ आणि मायाळू होती कि देवालाही तशी मैत्रीण जवळ ठेवायला आवडले. देवाने बोलावले आणि ती मैत्रीण निघून गेली. आज जे शब्द तिच्याजवळ होते ते फक्त आणि फक्त त्या मैत्रिणीची देण होते. म्हणून जेव्हा केव्हा ती लिहायला बसे तिला त्या प्रिय मैत्रिणीची आठवण झाल्याशिवाय राहवत नसे.

त्यानंतर तसं जवळच कोणीच बनू शकलं नाही. अगदी तिचा नवराही नाही, कि तिची आई सुद्धा तिच्या इतकी जवळ जावू शकली नव्हती. 
ती गेल्यापासून तिला खूपच एकट एकट वाटायचं. पण कोणाला सांगणार. देव पण असा असतो ना.

ती काहीतरी लिहायला सुरु करत होती आणि तिच्या डोळ्यातून टप टप धारा वाहू लागत. ती पुन्हा थांबे, विचारांच्या मागे पळत सुटे. गेल्या कित्तेक दिवसात ती हेच तर करत होती. 
अशा पळण्याने ती अक्षरशः खरोखरीच दमून जाई. तिला रात्री दिवसभर कुठल्यातरी खाणीमध्ये काम करून आल्यावर येतो तसा थकवा जाणावे. पण झोप मात्र येत नसे. पण याचा परिणाम म्हणजे घरातूनही तिने बाहेर पडायचे बंद केले होते.

तिला खरच कोणीतरी जवळच हव होत. पण कोणीच मिळत नव्हत किंवा कोणाचीच तिला झेलण्याची इच्छा होत नव्हती. तिला या रोज रोज विचारांच्या मागे धावण्याचा वैताग आला होता आणि खूप त्रास होत होता. कसलेतरी विचार करत बसायची आणि शेवटी रडून रडून थकून झोपून जायची. असलं जगण्यापेक्षा तिला मरून जावसं वाटायचं. 
पण परत एका मित्राची वाक्ये तिला आठवायची. कि आयुष्यामध्ये नेहमी आशावादी राहील पाहिजे - Optimist  असलं पाहिजे. आज तो तिच्याशी खूप तोडून वागतो हेही तिला लगेच त्यासोबत आठवायचे. आणि मग सगळ सगळ फोल फोल वाटायचं. सर्व खोट वाटायचं. आज तिने अशा बऱ्याच जणांना गमावलं होत. काही नियतीने हिरावून नेलं होत, काही नशिबाने तिच्यापासून दूर गेलं होत. पण देवालासुद्धा समजल नाही कि तिला खरच एका खूप समजूतदार मित्राची किंवा मैत्रिणीची गरज आहे. जो तिच्यावर मनापासून प्रेम करेल तिच्या सर्व गोष्टीमध्ये मनाने सोबत करेल. असा कोणीतरी मनकवडा, किंवा मनकवडी. 

तिने शेवटी कसबस लिहायला सुरु केलं -
'आज डोक्यामध्ये नेहमीसारखाच विचारांचा गोंधळ माजला आहे. नेहमीप्रमाणे मी विचारांच्या मागे धावत आहे आणि धावता धावता खूप थकली सुद्धा आहे. आणि शेवटी एक प्रश्न उरतोच - "आपण कशासाठी जगत आहोत.आपल्याला नक्की काय करायचे आहे." हे असले प्रश्न आले कि परत विचारांची शृंखला सुरु होते. पण आता मला खरच या प्रश्नांची उत्तर हवी आहेत. माणूस जन्म का घेतो? आई-वडील बाळाला जन्माला का घालतात? माणूस शिक्षण का घेतो? तो त्याची आयुष्याची काही ध्येये का ठरवतो? ती पूर्ण झाली तर तो आनंदित आणि नाही पूर्ण झाली तर दुखी का होतो? नोकरी का करतो? मैत्री का करतो? लग्न का करतो? आणि परत सर्व इथेच सोडून मारून का जातो?'
 'आई-वडिलांना खरच त्यांच्या प्रेमाचा अंश प्रत्यक्ष स्वरुपात या पृथ्वी वर आणून त्या प्रेमाला आणि प्रेमाच्या अंशाला वाढताना पाहायचे असते कि त्यांना खरतर त्यांचा वंश वाढवायचा असतो. कि खरतर हे काहीच खर नसून हा एक भावनिक खेळ मांडला आहे. जसा एक Reality Show , ज्यामध्ये आपण सर्व काम करतो पण ती खोटीच असतात शेवटी. आईच आणि बाळाच निस्वार्थ प्रेम असत तर मग आई का नाही आपल्या बाळाला सर्व काही निस्वार्थ पणे पाहायला शिकवत ? का तिचे विचार ती त्याच्यामध्ये रुजवते? माणूस हा प्रगत होत गेला तशी त्याची बुद्धी वाढली. म्हणजे तो विचार करू लागला, किंवा जास्त विचार करू लागला. 'विचार' म्हणजे त्याच मनसुद्धा हळू हळू निर्माण झाल आणि त्याचीही वाढ झाली, प्रगती झाली. प्रगती झाली म्हणजे वेग-वेगळ्या भावना अस्तित्वात आल्या. म्हणजे प्रेम-राग-द्वेष-उत्साह-दुखी या साऱ्या भावना सर्व नंतरच्या आहेत. मुळात एकच गोष्ट निरंतर राहिली - survival of fittest . म्हणजे हा मूळ विचार प्रक्टिकल आहे. आणि आज लोक सर्व प्रगती करून, सर्व भावभावना इतक्या वाढवून परत आपल्या मूळ विचाराकडेच जात आहेत. सोयीनुसार सर्वांशी वागायचं, सोयीनुसार प्रत्तेकाने एकमेकांशी संपर्क ठेवायचा, सोयीनुसार सर्वांच्या वागण्याचे अर्थ काढायचे आणि सोयीनुसार दुसऱ्यांच्या आयुष्याचे निर्णय घेवून मोकळे व्हायचे. आणि या सर्वामध्ये जर कोणी अप्रगत किंवा आदिवासी भागातले असतील तर त्यांना मात्र कोणाला एखाद वाईट वाक्य बोलल्याचासुद्धा त्रास होतो. अशा अप्रगत लोकांची प्रगती खुंटते आणि असे लोक मागे पडतात. खर तर असे लोक त्यांच्या आजूबाजूच्या लोकांपेक्षा आजूबाजूच्या वस्तूंबद्दल जास्त जागरूक व्हायला हवेत. उदा. माझा जॉब कसा टिकेल, माझी कंपनी कशी पुढे जाईल, किंवा माझी इज्जत कशी वाढीस लागेल, मी अधिक पैसा कसा कमावेल. कारण हीच परिमाण आहेत सुखी जगण्याची, पुढे जाण्याची आणि प्रगती करण्याची. '

ती खरच चिडली होती तिच्या आजू-बाजूच्या सर्व लोकांवर - ज्यांनी ज्यांनी तिला मनाने खूप छळलं होत. ज्यांच्यासाठी तिने जीवाचं रान केल होत त्यांना आज तिची काडीची किंमत सोडाच पण त्यांच्या आयुष्यात ती होती याची आठवणसुद्धा राहिली नव्हती. असे बरेच मित्र मैत्रिणी होते. ती फिरून फिरून मित्र मैत्रिणींवर का यायची याच कारण म्हणजे ती तिच्या मित्र मैत्रिणीवरच तर जगत होती. होत तिला कोण जवळच त्यांच्याशिवाय. घरातलं आणि नातेवाइकामध्ये तर जवळच कोणीच नाही. मग राहिले मित्र-मैत्रिणीच. त्यात पण मैत्रिणीच जास्ती. कारण मित्र तर पुढे कोलेज मध्ये बनलेले. 

ती पुढे लिहायला सुरुवात करते - 
'पण सारे सगळे स्वार्थी आणि ढोंगी. ज्यांना मी माझ्या आयुष्यात इतकी महत्वाची स्थान दिली ती अशी माझ आयुष्य उजाड करून, मला एकटीला सोडून निघून गेली. जाताना त्यांना काहीच कस वाटल नाही याच मला आश्चर्य वाटतंय. का तेसुद्धा Survial of the fittest च्या तत्वामध्ये अडकले होते कोण जाणे. लोकांना माणस महत्वाची का वाटत नाहीत याच मला खूप आश्चर्य वाटत. अजून एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे - लग्न. लोक लग्न का करतात हे सुद्धा एक मोठ कोडंच आहे. काही जन सर्व करतात म्हणून करतात, काहीना माहिती असत कि शरीराची गरज भागवायची असेल तर लग्नाशिवाय कुठला नैतिक मार्ग नाहीये,  कोणालातरी आपल्या आई वडिलांसाठी लग्न करायचं असतं, कोणाला उगाच हौस किंवा मज्जा म्हणून, कोणाला हुंड्यासाठी, कोणाला वंश पुढे चालवण्यासाठी, कोणी प्रेम करतो म्हणून, तर कोणी एक काम उरकून टाकायचं म्हणून लग्न करतात. पण अजून हे लग्नाचं कोड मला तरी उलगडलेलं नाहीये. लोक प्रेम करतात म्हणजे काय हेही मला ना उलगडलेलं अजून एक कोड आहे. किंवा आधी मला वाटायचं कि प्रेम म्हणजे एकमेकांची मनापासून वाटलेली काळजी. त्या काळजी पोटी आपण ज्यावर प्रेम करतो त्याला खुश ठेवण्याची धडपड. त्या खुशीसाठी काहीही करायची तयारी. आणि काहीही करताना त्याचा मोबदला मिळावा असे मनातही न येणे. प्रेम म्हणजे एका मैत्रिणीवरही असू शकते, भावावरही असते, आई वर असते, काकांवर असते, आजोबा-आजीवरही असू शकते, आयुष्याच्या जोडीदारावरही असते, आणि ते स्वतावारही असू शकते. पण जेव्हा मला यांपैकी बऱ्याच जणांनी माझी हि व्याख्या चुकीची ठरवली, यातली काही लोक मला प्रेम करायला जवळ लाभलीच नाहीत आणि काहींच्या जवळ मी जावू शकले नाही. तेव्हापासून मला फक्त शेवटच वाक्य पटत कि - प्रेम हे फक्त स्वतावरच असू शकत. आणि कोणावरच नाही. आई-वडीलसुद्धा आपल्या मुलांकडून अपेक्षा करतातच कि. आणि अपेक्षा भंग झाली कि त्यांना दुखही होते आणि ते दुख वेग-वेगळ्या मार्गाने व्यक्तही होते. आणि माझ्या आजूबाजूच्या या लोकांनीच मला माझी प्रेमाची व्याख्या बदलायला लावली. '

'हे असंच होत. आजकाल मी असेच विचार करत बसते. मधूनच काहीबाही आठवत रहात आणि बर्रोब्बर वेळेलाच मला आठवत. आणि मग असेच रागाचे ज्वालामुखी मनामध्ये आणि डोक्यामध्ये धुमसत राहतात. सर्व लोकांचा राग राग येत राहतो. आणि मग माझंही मन नकळतपणे ठरवू लागत, कि सर्वाना एकदा अद्दल घडली आणि घडवली पाहिजे. माझे दिवस सुरु झाले कि एकेकाची अश्शी जिरवेल ना मग कळेल या सर्वाना कि मी काय चीज आहे. आणि अगदीच नकळतपणे मीसुद्धा त्या नियमाला माझ आयुष्य जगण्याच परिमाण करू पाहते - Survival of the fittest .' 


P . S . - 'असंच विचारांच्या मागे धावून धावून मी थकून जाते. इतका वेळ निद्रादेवीची केलेली आराधना फळास येते. आणि हळू हळू झोप मला येण्यास सुरुवात होते. .........   

शब्द मनीचे

आज काल मी फिरत असते वाऱ्याच्या रस्त्यावर,
शोधात असते आठवणी पाला पाचोळ्यावर,
मन माझे कुठे तरी पळून गेले आहे,
आणि मी फक्त जागतिये काही उधार श्वासांवर...  

हट्टाने बाधलेले घरटे आणि मांडलेला संसार,
उधळलेल्या  सावल्या अन घुसमटलेला हुंकार,
काहूर जेव्हा उठते ठायी,
तेव्हा पटते, हाताचे सोडून आहे मी पळत्याच्या मागावर...
बस्स जागतिये काही उधार श्वासांवर...

आता काय विचार करते कळेनासे होते,
हसण्याच्या वेळी उगाच भरून येते..
गुलाबाचे सुगंध आता सरू लागले,
मागे उरले काटेच काटे...

दूर पाहते आकाशाच्या वर,
कुठून कानी पडतो का आशेचा स्वर,
जोवर आहे त्या विधात्याचा आधार,
तोवर माझ्या प्रयत्नाचा भार..
बाकी स्व-सोडून आता सर्व काही,
त्या जन्मदात्याच्या ऋणाची होऊ कशी मी उतराई.. 
     

Sunday, August 19, 2012

विश्लेषणात्मक


(आदरणीय राजीव उपद्ध्ये यांनी त्यांच्या ब्लोग वर जो लेख प्रसिद्ध केला त्यावरील संश्लेषण. ब्लॉगची लिंक दिली आहे खाली. आधी त्यांचा लेख वाचा म्हणजे खालील टिप्पणी समजण्यास मदत होईल. )

http://rajeev-upadhye.blogspot.in/2009/07/blog-post_30.html


सर, तुमचा अनुभव आणि कार्य खूप मोठे आहे. पण तरीही मला काही मुद्दे इथे नमूद करावेसे वाटतात. 
तुमचे लिखाण, माझ्या मताप्रमाणे मला, सार्वत्रिक वाटत नाही. मी तुम्हाला पुरुषप्रधान आहात असे कुठेही म्हणणार नाही. पण तुम्ही ज्याप्रमाणे "मुक्त स्त्री" ची जी व्याख्या केली आहे ती थोडीशी चुकीची वाटते. तुमचा आधार कदाचित Metropolitian Cities मधल्या स्त्रियांबद्दल असेल तर ठीकच आहे. भारत हा अजूनही खेड्यांचा देश आहे, इथे हजारो गावांमध्ये अजूनही लाईट पोचलेली नाहीये. त्यामुळे जेव्हा आपण 'स्त्री' किंवा 'पुरुष' यांच्याबद्दल सार्वत्रिकपणे बोलतो तेव्हा फक्त शहरातल्या लोकसंख्येचा  विचार करून बोलणे चुकीचे ठरेल. 'घटस्फोट' हा शब्द आज शहरी भागामध्ये रुळला जरी असला तरी मोठी शहरे सोडली, पुणे-मुंबई-चेन्नई-नागपूर-दिल्ली इ.इ., तर बाकी तर अजूनही ग्रामीण भागच आहे. आणि या भागामधील स्त्रियांचा विचार करणेही गरजेचे आहे असे मला वाटते. अजूनही स्त्री हि उपभोगाची एक 'वस्तू' म्हणून जेव्हा पुरुष तिच्याकडे पाहतो तेव्हा समाज हा २०० वर्षेच काय पण १००० वर्षे मागे असल्याचा पुरावा सापडतो.  

" आजची स्त्री मात्र पूर्ण वेगळी आहे. ती एक तर मुक्त आहे किंवा मुक्त होण्यासाठी धडपडत आहे, मग ती समाजाच्या कोणत्याही थरातील असो." 
तुमचे म्हणणे कदाचित एखाद्या दुसऱ्या देशाबाब्तीत जसे कि यु.के., अमेरिका,  १००% खरे होईल. पण भारत आणि भारतासारख्या, कांगो, आफ्रिकेतील बरेच मागास देश यांच्याबाबतीत आपले विधान चुकीचे ठरेल असे म्हणण्यास मला खेद वाटतो. आपल्या या वाक्याचे संदर्भ तुम्ही विस्तृत केले तर वस्तुस्थिती लक्षात येईल. आजची स्त्री पुरुषापासून, किंवा कोणत्याही जबाबदारीपासून मुक्त होण्याचा प्रयत्न करत नसून; तिला ज्याप्रमाणे 'चूल आणि मुल' या गोष्टीला जखडलेले आहे आणि स्त्रीने फक्त हेच करावे हि जी समाजाची मानसिकता आहे त्या मानासिक्तेपासून ती मुक्त होऊ पाहत आहे. जी मानसिकता स्त्रीला आखाड्पणे बोच्कारते आहे. आणि या समाज म्हणवणाऱ्या लोकांमध्ये जसे पुरुष आहेत तशा काही स्त्रिया खुद्द आहेत ज्या दुसऱ्या स्त्रीच्या मार्गात अडसर बनत आहेत. त्यामुळे मी कुठेच असे म्हणणार नाही कि 'पुरुष' सर्व गोष्टीला जबाबदार आहेत. जबाबदार आहे ती - मानसिकता, जी अजूनही १००% बदललेली नाहीये. तुम्ही म्हंटल्याप्रमाणे जेव्हा माणूस जंगलामध्ये राहत होता तेव्हा जंगली प्राण्यांपासून रक्षण करणे, शिकार करणे, शत्रूपासून रक्षण करणे हि कामे पुरुषाने स्वीकारली किंवा त्यांच्या जास्त शारीरिक क्षमतेमुळे त्यांना हि कामे निसर्गदत्त मिळाली आणि त्याच वेळी प्रजोत्पादन, मुलांचे संगोपन, घराची साफसफाई (त्यावेळी गुहेत माणूस राहायचा), आणि इतर कमी कष्टाची कामे स्त्रीने स्वीकारली किंवा तिला ती निसर्गदत मिळाली. पण आज पुरुष हा फक्त काही शारीर कष्टाचीच कामे करतो असे नाही, जिथे बुद्धीची आवश्यकता असते अशी बरीच कामे आहेत. आणि जस - जशी प्रगती होऊ लागली तशी स्त्रीला जेव्हा ती करायची इच्चा निर्माण झाली  तेव्हा या गोष्टी कुठेतरी नाकारल्या गेल्या त्या जंगलात राहण्याच्या मानासिक्तेवारच ना. माणूस खूप पुढे आला, पण स्त्रीबद्दलचे विचार आणि पुरुषाबद्दलचे विचार हे कदाचित आपल्या जनुकामध्ये खोलपर्यंत रुजले आहेत. आपण आज घरात राहतो, बंगल्यात राहतो, खेड्यांचा विचार केला तर वाड्यामध्ये किंवा झोपाद्यामध्ये राहतो. माणसाने शिक्षण पद्धती निर्माण केली त्याचे मूळ म्हणजे माणसाने स्वताला आणि समाजाला सुसंस्कृत, आरोग्यपूर्ण, भावी पिढीला जगण्यास सुसज्ज आणि स्वताला समृद्ध बनवावे यासाठी. आणि स्त्री सुद्धा माणूसच आहे, समाजाचा भाग आहे. जेव्हा तिला हे नाकारले जाते तेव्हा ती कुठेतरी या नाकारण्याच्या मानसिकतेपासून मुक्त होऊ पाहते, मुक्त होण्यास बंड करते. पण तिचे हे बंड फक्त एका पुरुषाशी नसून, समाजाशी आहे. 
आज शहरांमध्ये तुम्ही म्हंटल्याप्रमाणे परिस्थिती आहे. स्त्री हि तिला मिळालेल्या कायद्यांचा दुरुपयोग करत आहे, घटस्फोटासारखा निर्णय चुटकीसरशी घेते, तिच्या बिदागीसाठी ती कोर्टामध्ये केस फायली करते. जोब करणारी स्त्री असेल तर ती तिच्या स्त्रीत्वाच्या जोरावर आणि सहानुभूतीवर कदाचित यशाच्या पायऱ्या चढत असते, किती वेळा यामुळे खर्या खुर्या कष्टाळू पुरुषाच्या मार्गामध्ये अशीच एखादी स्त्री येत असेल, सुखवस्तू घरातून जेव्हा लग्न होवून स्त्री आपल्या सासरी जाते आणि जेव्हा तिच्या मनाप्रमाणे काही झाले नाही तर ती त्याला 'छळ झाला' असे म्हणून माहेरी निघून जाते. 
बऱ्याच सुना किंवा सासवा आपली जबाबदारी झटकून वागत असतात. आणि कदाचित एका सुनेच्या विचारसरणीला दुसरीच सासुच कारण असेल. पण हे सर्व जास्तीत जास्त शहरांमधली बाजू दर्शवते. ग्रामीण भागात आत्ता कुठे मुली दहावीपर्यंत शिक्षण घेवू लागल्या आहेत. त्या आत्ता कुठे खऱ्या स्वातंत्र्याला समजू लागल्या आहेत. त्यांच्याबद्दल हे विधान चुकीचे ठरते. 
केवळ शहर्यातल्या लोकसंखेच्या आधारावर आपण पूर्ण प्रदेशाचे सामिक्षीकरण करू शकत नाही. 
आणि काही गोष्टीला केवळ स्त्री जबाबदार आहे असे म्हणता येणार नाही, आज जी छोटी कुटुंबे असतात, व्यापारीकरण, मॉल संस्कृती, आई-वडिलांनी आपल्या मुलांना सहज उपलब्ध करून दिलेल्या गोष्टी यामुळे पुढे जावून अशा वातावरणात वाढलेली मुलगी सासरी जावून तशीच वागू शकते. याला केवळ तिचे स्त्रीत्व जबाबदार नसते. 
आणि राहिली गोष्ट विवाह बाह्य संबंधांची, तर तुमचे विधान मी पूर्णपणे नाही पण अर्धे चुकीचे आहे असे म्हणेल- माझ्या या म्हणण्याला माझ्याकडे आधार आहेत आणि हे विधान मी Generalisation पद्धतीने करत आहे.

बाकी तुम्ही खऱ्या सप्तपदीचे महत्व, त्याचा इतिहास, किंवा त्याचे धार्मिक महत्व आधी काय होते आणि आत्ता काय असायला हवे, किंवा जी सात वचन आहेत त्यामागचे विवेचन,  ते आज का करावे किंवा करू नये याची माहिती लेखामध्ये दिली असती तर लेख अजून उपयुक्त झाला असता. आणि ज्यावेळी तुम्ही पुरुषाची बाजू मांडलीत त्यावेळी स्त्रीसाठी याचे महत्व, समाजामध्ये या रिती-रिवाजांचे स्थान  हे सुद्धा मांडायला हवे होते. म्हणजे हा लेख बराच त्रयस्थ पद्धतीचा वाटला असता.

असो. सर तुम्ही खूप अनुभवी आहात, त्यामानाने मी खूपच लहान आहे. तुमच्या लेखात काय असायला हवे हे मी ठरवू शकत नाही. पण जेव्हा लेखक काही लिहितो तेव्हा त्या विषयाला अनुसरून वाचकाच्याही काही अपेक्षा असतात. कदाचित या अपेक्षेतूनच मी हा लेख लिहिला. पण शेवटी त्यावरून आपण आपले विचार बदलू शकत नाहीत आणि लेखनही. पण वाचकांच्या विचारांचे स्वागत नक्कीच करू शकतो. आणि आपल्या जेव्हा मनापासून पटेल तेव्हा आपण अंगिकारू शकतो.  आणि जर आपल्या लेखनाचा काही चुकीचा अर्थ कोणत्या वाचकाने घेतला असेल तर त्यातील मुल मुद्दा आपण वाचकाला समजावून सांगू शकतो. मी माझे विचार व्यक्त करताना कुठे चुकून तुमच्या भावनांना दुखावले असेल तर क्षमस्व. मला तुमच्याबद्दल खूप आदर आहे.  
धन्यवाद.     

(माझ्या या लेखात मी थोड स्त्री आणि पुरुष या दोन जातींविषयी लिहायचा प्रयत्न केला होता. ते अवश्य वाचावे.
'याला जीवन ऐसे नाव'.)